Vidarbha Rain 2025 राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. अशातच 2 दिवसांत हवापालट होण्याचा अंदाज असून काही भागात पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्यातील तापमानामध्ये या आठवड्यात सतत चढ-उतार सुरू आहे. गेले काही दिवस मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट आहे. आता तेथील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र, विदर्भातील तापमानात वाढ झाल्याने काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान 40 अंश पार गेले आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर
मायानगरी मुंबईतील तापमानात गेल्या दोन दिवसांत घट जाणवत आहे. 17 मार्च रोजी मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून पुढील 24 तासांत तापमानात आणखी घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके राहील. पुण्यात 17 मार्च रोजी मुख्यतः निरभ्र आकाश राहून सायंकाळी किंवा रात्री अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत त्याठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये. त्याचबरोबर 2 दिवसांनी हवापालट होऊन त्याठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमधील तापमानात अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके राहील. 17 मार्च रोजी नाशिकमध्ये आकाश निरभ्र राहील. त्यानंतर 2 दिवसांत सकाळच्या वेळी धुके पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. विदर्भात गेले दोन ते तीन दिवस विविध जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला होता. 17 मार्च रोजी चंद्रपूरमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात सतत बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे लागेल. पुढील 2 ते 3 दिवसांत हवापालट होऊन काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे सतत बदलणाऱ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |