Ujani Dam Water Level 2025 टेंभुर्णी : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचनुर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे टाकळी येथील बंधाऱ्यात मंगळवार पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

बुधवारी किंवा गुरुवारी हे पाणी बंद होण्याची शक्यता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 56 टक्के आहे. पुढील आठ दिवसात उजनी धरण निम्म्यावर येणार आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसली तरी नियमाप्रमाणे 10 मार्चपासून उजनी मुख्य कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडले जाऊ शकते.
कालव्यातून उन्हाळी दोन आवर्तने मिळू शकतात. सध्या धरणात 56.21 टक्के पाणी पातळी आहे. भीमा नदीत पाणी सोडले त्यावेळी गेल्या सोमवारी 63.87 टक्के इतका होता. आठ दिवसात दररोज एक टक्क्याप्रमाणे आठ टक्के पाणी घटले आहे.
103 टक्के पाणीसाठा डिसेंबर मध्ये होता
26 डिसेंबर रोजी सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी 103 टक्के पाणीसाठा होता. तर 29 डिसेंबर 2024 रोजी उजनी धरणाची 100 टक्के पाणी पातळी होती.
ज्वारी काढणी यंत्राची किमया न्यारी, कमी कष्टात उत्पादन भारी, वाचा सविस्तर..
6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू
- सध्या सीना – माढा योजनेतून 342 क्युसेस तर दहिगाव योजनेतून 120 पाणी क्युसेक सोडण्यात येत आहे. तर गेल्या सोमवारपासून उजनीतून भीमा नदीत 6000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
- रब्बी हंगामातील उजनीतून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी 14 फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले होते.
- 10 मार्चपासून उन्हाळी आवर्तन कालव्यातून सोडले जाण्याची शक्यता असून हे पाणी एप्रिल आखेरपर्यंत 42 दिवसांची पाणी पातळी मिळणार आहे.
- उजनीतून भीमा नदीत सोडलेले सोलापूर व नदीकाठचा गावांना हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे.

पुढील तीन महिने महत्त्वाचे
शेत पिकांसाठी पुढील तीन महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. रब्बी आवर्तन 4 जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. त्यावेळी उजनीत उपयुक्त 49.71 टीएमसी पाणीसाठा होता.
सध्या 30.11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्या एकूण 93.77 टीएमसी पाणी साठा उजनी धरणात आहे. 63.66 टीएमसी मृत साठ्यात धरले जाते.